शनिवार, १८ जानेवारी, २०२५

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ६

 सहावा दिवस

आज सकाळी नाश्ता करून आम्ही नेहमीप्रमाणे लवकरच अयोध्येहून प्रयागला जायला निघालो.
हा प्रवास जवळजवळ सहा तासांचा होता . पण मध्ये चहा आणि जेवणासाठी थांबावे लागले, शिवाय प्रचंड ट्रॅफिक, ह्या सर्वामुळे प्रयागला पोचायला संध्याकाळचे चार वाजले.
हाॅटेलवर पोचून जरा फ्रेश झालो आणि लगेचच त्रिवेणी संगमावर जायला निघालो. इथे सुद्धा काही अंतरापर्यंतच बसला परवानगी आहे. त्यानंतर टोटो करावी लागते.
आम्ही सर्वांनी मिळून चार टोटो केल्या.
प्रयागला माघ महिन्यात मेळा असतो. हा मेळा म्हणजे मिनी कुंभमेळा म्हणायला हरकत नाही . जिथवर नजर जाईल तिथवर लहान लहान तंबू बांधलेले होते.
जागोजागी मांडव घालून प्रवचनं चालू होती. कुठे गीता प्रवचन, कुठे रामचरितमानस तर कुठे भागवत सप्ताह.
मध्येच कुस्तीसाठी आखाडेही बांधलेले होते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला जत्रा असल्यागत छोटी छोटी दुकानं होती. पुजेचं सामान, खायच्या वस्तू, खेळणी, साड्यांचे स्टाॅल्स.
तिथेच कितीतरी साधू बाजूलाच बसून चिलीम ओढत होते, कोणी तिथेच भर रस्त्याच्या कडेला चहा बनवत होतं तर कुणी काय शिजवत होतं.
आमच्या रिक्षा निघताना एकत्रच निघाल्या पण कधी कुठे कसे आम्ही एकमेकांपासून हरवलो कळलेच नाही.
पाहावं तिथे फक्त गल्ल्याच गल्ल्या आणि राहुट्या. कुठेही घाटाजवळ पोचल्याची खूण म्हणून पाणी दिसत नव्हतं कि बाहेर पडायचा मार्गही कळत नव्हता .
भुलभुलैय्या म्हणजे काय ते आम्ही त्यादिवशी अनुभवलं. चारही टोटो चार वेगवेगळ्या दिशांना कितीतरी वेळ एकमेकांना शोधण्यासाठी धावत होत्या.
मध्येच समोरचा रस्ताच बंद व्हायचा मग परत फिरून दुसरीकडे टर्न मारायची.
प्रत्येक कोपर्यावर आमचा टोटो चालक इतरांना फोन करून ते कुठे आहेत विचारायचा.
कोण गेट नंबर ४च्या घाट नंबर २ वर, तर कुणी गेट नं ४च्या घाट नंबर ५वर, तर कोणी गेट नंबर ६वर होते.
फोन करत करत शेवटी जवळजवळ दीड दोन तासांनी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्रिवेणी संगमाजवळच्या एका घाटावर गेलो.
तिथून अंधारातच जरा लांब दिसणारा संगम पाहिला. तिथेच मग पाय बुडवून नमस्कार केला आणि प्रोक्षण करून समाधान मानलं.
तिथूनच पुढे एक हनुमानाचं मंदिर होतं . पण ते पाहायला पूल वरून जावं लागणार होतं. आणि पूल बराच मोठा होता. १५-२० मिनीटांचं तरी चालणं होतं.
पूलवरून टोटो ला जायला अर्थातच पोलीस परवानगी देत नव्हते.
मग हो नाही करत दुसर्या मार्गाने टोटोने आम्ही त्या मंदिरात गेलो.
इथे हनुमानाची अतिशय भव्य अशी आडवी झोपलेली मूर्ती आहे.
असं म्हणतात कि हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मणाला अहिरावण महिरावणाच्या तावडीतून सोडवले त्यानंतर त्याने इथे विश्रांती घेतली होती म्हणून अशी आडवी मूर्ती.
हेही दर्शन अगदी मनासारखं झालं. त्या दिवशी मग इतक्यावरच आवरतं घेत आम्ही हाॅटेलवर आलो. जेवलो आणि झोपी गेलो.

(क्रमशः)
© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...