शनिवार, १८ जानेवारी, २०२५

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ७

 सातवा दिवस

आज आम्ही चित्रकुटला जाणार होतो. इथेच राम आणि भरताची भेट झाली होती आणि भरत श्रीरामाच्या पादुका घेऊन आला होता.
श्रीरामांना अनेक प्रकारे समजावूनही ते अयोध्येला परत येत नाहीत म्हणून भरतानेही अयोध्येत पाऊल न ठेवता अयोध्येबाहेर असलेल्या नंदीग्रामात पादुकांची स्थापना केली आणि १४ वर्ष व्रतस्थ राहून इथूनच अयोध्येचा राज्यकारभार पाहिला होता.
म्हणून सर्वात आधी आम्ही नंदिग्रामला गेलो.
भरताने रामाकडून १४वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत यायचे वचन घेतले होते. रामाला यायला एक दिवस जरी उशर झाला तरी भरत प्राणत्याग करणार होता.
म्हणूनच रामाने आपण परत येत आहोत हि खबर देण्यासाठी आधी हनुमानाला भरताच्या भेटीला पाठवले.
भरत आणि हनुमानाच्या भेटीचे एक सुरेख मंदिर नंदिग्रामात आहे. दोघांचीही गळामिठी दाखविणार्या मूर्त्या अतिशय देखण्या आहेत.
तिथेच बाजूला एका गुहेत श्रीरामांच्या पादुकांचेही मंदिर आहे आणि नंतर भरत श्रीराम ह्यांच्याही भेटीचे मंदिर आहे. ह्यात श्रीरामांच्या मूर्तीचा एक पाय जरासा वरती आहे.
लाडक्या भावाला दीर्ध काळानंतर भेटतानाची उतावीळ स्थिती ह्यातून मूर्तीकाराने अचूक दाखवली आहे.
फारशी गर्दी नसल्याने इथे अगदी निवांत दर्शन झालं.
इथे २०१९ पासून पुढील चौदा वर्ष अखंड रामनामाचा जप सुरू आहे.
गावातील सगळे तासतासभर येऊन ह्या पवित्र कार्याला हातभार लावतात.
तिथे रोज दुपारी भंडारा असतो.
पुजारी आम्हाला भंडार्यात जेवूनच जायचा प्रेमळ आग्रह करत होते .
पण आम्हाला पुढे आणखी खूप ठिकाणं पाहायची असल्याने नाईलाजाने नाही म्हणावं लागलं.
ह्या परिसरात सुद्धा भरपूर माकडं आहेत.
तिथून पुढे चित्रकूटला अत्री ऋषी आणि सती अनुसूयेच्या आश्रमात गेलो.
एकदा अत्री ऋषींना तपस्येनंतर तहान लागली होती तेव्हा त्यांची तहान भागविण्यासाठी सती अनुसूयेने गंगेची प्रार्थना केली आणि गंगा मंदाकिनी नदीच्या रूपात इथे प्रकट झाली होती .
आश्रमा जवळच असलेले मंदिकिनीचे उगमस्थान पाहिले.
वनवासाला निघालेले राम लक्ष्मण आणि सीता इथे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे होते. अत्री ऋषींच्याच सांगण्यावरून रामाने वनवासातील काही काळ चित्रकूटात घालवला असल्याने हे स्थळ खूप पवित्र मानले जाते.
श्रीरामासाठी विश्वकर्माने बांधलेली एक भली मोठी दगडी गुंफा इथे आहे. गुंफेचे तोंड खूपच अरूंद होते वाकतवाकत आत जावे लागले.
आत बर्यापैकी कोंदट पण थंड वातावरण होतं. आतमध्ये ठिकठिकाणी राम हनुमान शंकर ह्यांच्या मूर्त्या होत्या.
तिथेच गुहेत एकीकडे खटखटा चोर लिहिलेला बोर्ड दिसला. पायर्या चढून वर जाऊन नमस्कारही करून आलो.
खाली उतरल्यावर राहूलने गोष्ट सांगितली ती अशी की एकदा सीतामाई स्नान करताना इंद्राचा पुत्र जयंत तिला चोरून पाहात होता.
तेव्हा संतापून लक्ष्मणाने त्याला पकडले आणि गुहेतच उलटे टांगून ठेवले.
गोष्ट ऐकून आम्ही परत वर पाहिले तर तिथेच गुहेच्या वरच्या बाजूला एक काळी दगडी आकृती टांगल्यासारखी दिसली. हाच तो खटखटा चोर.
असं म्हणतात कि इथे वास्तव्य असताना सीतेला स्वयंपाकासाठी पाणी मिळावं म्हणून गोदावरी नदी गुहेतच प्रकट झाली.
ह्या नदीचा उगमही ह्या गुहेतच आहे आणि ती लूप्त सुद्धा ह्याच गुहेत होते.
म्हणून तिला गुप्त गोदावरी म्हणतात.
तिथून मग बसने हनुमान धारा बघायला गेलो. हे मंदिर कामदगिरी पर्वतावर खूप उंचावर असल्याने आम्ही रोपवे ने गेलो.
लंकादहना नंतर होत असलेली शरीराची आग कमी व्हावी म्हणून हनुमानाने श्रीरामांची प्रार्थना केली.
तेव्हा श्रीरामांनी जमिनीत बाण मारून एक जलधारा बाहेर काढली.
ही पाण्याची धार सतत हनुमानाच्या शरीरावर पडत असल्याने त्याचा दाह कमी झाला.
म्हणून ह्या जागेचे नाव हनुमान धारा. इथेही खाली आल्यावर वानरांचा सुळसुळाट आहे.
इथून मग 'रामायण दर्शन मंदिर' नावाच्या एका अनोख्या मंदिरात गेलो.
मंदीराच्या आवारातच हनुमानाची भव्य मूर्ती आहे .
खरंतर हे मंदिर कमी आणि संग्रहालय जास्त वाटत होते.
इथे अनेक दालनातून रामायणातील जवळजवळ सर्वच मुख्य प्रसंग, भलीमोठी भित्तीचित्रे आणि मूर्त्यांच्या आधारे वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेले होते.
त्या चित्रातील आणि मूर्त्यांमधले भाव विलक्षण जिवंत वाटत होते. दालनाच्या बाहेर वेगवेगळ्या भाषेतील रामायणाचे ग्रंथ काचेच्या कपाटात ठेवलेले होते.
आपले वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, आनंद रामायण, अध्यात्म रामायण वगैरे तर होतेच पण तिथे अगदी चायनीज, बर्मीज, नेपाळी, श्रीलंकन आणि इतर सर्वच देशात प्रसिद्ध असलेले रामायणाचे ग्रंथ मांडून ठेवले होते.
संपूर्ण विश्वभरात श्रीरामां विषयी असलेली ही अपार श्रद्धा पाहून काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येणार.
तिथून बाहेर पडलो आणि भूकेची जाणीव झाली. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. आज दुपारचं जेवणच झालं नव्हतं. समोरंच एक छोटंसं हाॅटेल होतं तिथे मग चहा बिस्कीटं आणि त्या हाॅटेलच्या मालकाने प्रेमाने बनवलेले ब्रेड पॅटीस चाट खाऊन पोट भरून घेतलं. आणि बसमध्ये बसून पुढचा प्रवास सुरू झाला.
मध्येच 'सतना' जवळ मेघा आणि तिच्या मिस्टरांना सोडले कारण सतनाहून त्यांची रात्री मुंबई साठीची ट्रेन होती.
आम्ही सर्व दुसर्या दिवशी दुपारी फ्लाईटने जाणार असल्याने आम्हाला परत चार पाच तास प्रवास करून आता प्रयागला पोहोचायचे होते.
परत ट्रॅफीकने भरलेला रस्ता आणि आमचा बस ड्रायव्हर फुल्ल स्पीडमध्ये बस नेतोय आपला. जरी वेगाने चालवत असला तरी त्याचा व्हीलवर पूर्ण कंट्रोल होता. म्हणूनच खचाखच ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावरून त्याने आम्हाला रात्री पावणेदहाला सुखरूप हाॅटेलवर आणून सोडलं.

(क्रमशः)
© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...