आठवा दिवस
गेल्या आठ दिवसात आम्ही उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश अशी तीन राज्य फिरलो. भरपूर ठिकाणं पाहिली आणि भरपूर प्रवासही केला . बसमधून प्रवास करताना नाजूक पिवळ्या फुलांनी बहरलेली सरसोंची शेतं आमची सोबत करायची. सूर्याच्या प्रकाशात तो चकाकता पिवळा गालिचा डोळ्यांना दिपवायचा.
आठ दिवसांपैकी मला वाटतं एखाद दुसरा दिवस सोडला तर रोज गोड पदार्थात पनीर-माव्याचे लुसलुशीत आणि रसरशीत गुलाबजाम होते त्यामुळे सतीश एकदम खुश होता. तर अशी ही आमची सहल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचली होती.
आज खरंतर आमचा सहलीचा शेवटचा दिवस . पण दोन दिवसांपुर्वी प्रयागला त्रिवेणी संगमावर गेलेलो तेव्हा मनासारखं दर्शन झालं नव्हतं म्हणून काहीजणांनी पहाटे साडेपाचला उठून परत तिथे जायचं ठरवलं .
आम्ही काहिजणं हाॅटेलवरच राहिलो.
पहाटे संगमावर बोटीतून गेलेल्यांना अगदी मनासारखं दर्शन झालं, पूजा करता आली आणि स्नानही करता आलं त्यामुळे त्यांचीही इच्छा पूर्ण झाली.
मग आम्ही सगळेच सामानाची बांधाबांध करून बसने प्रयागच्या विमानतळावर पोचलो. हे विमानतळ आधी आर्मीसाठी वापरले जायचे .
अतिशय छोटे पण नीटनेटके असे हे विमानतळ आहे.
आम्ही अगदी वेळेवर पोचलो पण बरोबर त्याच दिवशी सकाळी पाऊस पडला होता आणि सगळीकडे धुकं पसरलं होतं. त्यामुळे असेल पण फ्लाईट सुद्धा तीस चाळीस मिनीटं उशीरा आली.
मग वेळ जाता जाईना म्हटल्यावर कोणी लाडू, बिस्कीटं, चिवडे काढले तर कोणी राजगीरा लाडू आणि सुका मेवा काढला. काहीजणांनी तेवढीच संधी साधून दुकानात कपडे आणि पुस्तकं खरेदी केली. कोणी काॅफी तर कोणी सॅन्डवीच तर कोणी पोहे खाल्ले.
शेवटी एकदाची फ्लाईट आली आणि आम्ही सगळेच फ्लाईटने सुखरूप घरी पोचलो. अशाप्रकारे आमची अयोध्या यात्रा आणि त्रिस्थळी सुफळ संपूर्ण झाली.
ह्या सहलीत अनेक नवीन ओळखी झाल्या, जीवाभावाच्या नवीन मैत्रिणी मिळाल्या ज्यांचा स्नेह आयुष्यभर असाच राहणार आहे. त्या सर्वांसोबत आणखीही अनेक सहली होतच राहतील ज्याविषयी लिहिल्यावर तुम्हालाही कळेलच.
(समाप्त )
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा