शनिवार, १८ जानेवारी, २०२५

अयोध्यायात्रा आणि त्रिस्थळी - भाग ४

 दिवस चौथा

काल आम्ही बोधगया पाहिली होती आजचा दिवस आम्ही हिंदू गया पाहणार होतो.
सर्वात आधी आम्ही विष्णूपद मंदिरात गेलो. इथे काळ्या दगडातील विष्णूच्या पदचिन्हांची पूजा होते.
या विषयीची राहूलने आम्हाला सांगितलेली कथा अशी की "त्रिपुरासुराच्या वधानंतर धार्मिक वृत्तीच्या त्याच्या पुत्राने, गयासूराने तपस्या करून ब्रह्माचे वरदान मिळवले की तो ज्याच्याकडे पाहील तो स्वर्गात जाईल. अशा प्रकारे सगळेच स्वर्गात जायला लागले आणि स्वर्गात जागा कमी पडू लागली.
तेव्हा सर्व देव विष्णूकडे मदत मागायला केले.
विष्णूच्या सांगण्यावरून देवांनी गयासूराकडे यज्ञासाठी त्याचे शरीर मागितले. त्याने आनंदाने सत्कार्यासाठी ते दिले आणि पाच कोस पसरलेल्या त्याच्या शरीरावर यज्ञ झाला.
शेवटी विष्णूने त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवले. त्यावेळी गयासुराने विष्णूकडे वर मागितला कि या क्षेत्री जो पिंडदान करेल त्याच्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती होईल."
तिथून जवळच मंगळागौरीचे मंदिर आहे. देवी सतीच्या शरीराचे भाग जिथे जिथे पडले तिथे शक्तिपीठे निर्माण झाली अशी मान्यता आहे.
इथे देवी सतीचे स्तन पडले अशी मान्यता आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे जागृत शक्तिपीठ मानले जाते.
मुख्य देऊळ अतिशय लहान असून आतमध्ये पूर्ण काळोख आहे.
हे देऊळ म्हणजे एक अतिशय छोटीशी चिंचोळी गुहाच आहे. एकावेळी फक्त एकच जण तेही पूर्ण वाकूनच आत जाऊ शकतं.
आतमध्ये फक्त एका मोठ्या परातीत तुपाची मंद वात बारा महिने चोवीस तास तेवत असते.
त्या मंद प्रकाशात देवीचे ते दर्शन विलक्षण गूढ वाटावं असंच होतं.
मन मात्र एका वेगळ्याच पवित्र भावनेने भारावून गेलेलं जाणवलं.
इथून मग फल्गु नदी पाहायला गेलो. इथे सीतेने महाराज दशरथांना त्यांच्याच सांगण्यावरून वाळूचे पिंड बनवून त्यांचे तर्पण केले होते.
म्हणून तिथे वाळूचे पिंडदान करण्याची पद्धत रूढ झाली.
तिथल्या घाटावर ठिकठिकाणी पिंडदान आणि श्राद्धकार्य चालू होती.
तिथून निघेतोवर दुपार झाली होती आणि सर्वांनाच भुका लागल्या होत्या. मेघाला तिथला प्रसिद्ध पदार्थ "लिट्टी चोखा" मिळण्याचं एक ठिकाण माहिती होतं.
पण आम्हाला काही ते सापडलं नाही आणि सकाळपासून मनात असल्याने "लिट्टी चोखा" तर खायचाच होता.
मग एकिकडे बस थांबवून काही स्थानिक लोकांना विचारत विचारत एका टपरीवजा छोट्याशा दुकानात "लिट्टी चोखा" मिळाला.
पण ती टपरी पाहून आमच्यातील काहींनी स्वतःकडे असलेले लाडू चिवडा भेळ खाणं जास्त पसंत केलं.
आम्ही मात्र त्या "लिट्टी चोखा"चा मनापासून आस्वाद घेतला.
कोळशावर भाजलेल्या खरपूस लिट्ट्या आणि बटाट्याचा चोखा आणि आग्रह करकरून प्रेमाने वाढत होती ती माणसं.
खूप मजा आली. काहीतरी खरखूरं स्थानिक खाल्ल्याचं समाधान मिळालं.
आजचे फोटो खूपच कमी आहेत कारण कुठेही मोबाईलची परवानगी नव्हती.
तिथून परत आमची वरात बसमध्ये बसली आणि पुढील प्रवास सुरू झाला.
हा प्रवास परत चार पाच तासांचा होता. त्यारात्री परत वाराणसीलाच पहिल्या दिवशी उतरलेल्या हाॅटेल एलिगन्स मध्येच आमचा मुक्काम होता.
पहिल्या रात्री वाराणसीत राहिलेलो तेव्हा तिथलं बनारसी पान खायचं राहून गेलेलं .
ते लक्षात ठेवून प्रज्ञाने आवर्जून सर्वांसाठी रात्रीच्या जेवणानंतर बनारसी पान मागवलेलं.
तोंडात विरघळणार्या त्या बनारसी पानाची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे.
दुसर्या दिवशी अयोध्येला जायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळीच जणं रात्री थकल्या शरीराने पण उत्साही मनाने झोपी गेलो.

(क्रमशः)
© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ताडोबा - जंगल सफारी

   ह्यावर्षीच्या जीवघेण्या उकाड्यात कुठे बाहेर जाणं तर सोडाच पण घरच्या घरीही गरमीचा त्रास सहन होत नाही. अशातच जर नागपूरला जायचा बेत ठरत असेल...