दुसरा दिवस
दुसर्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही गंगास्नानासाठी अस्सी घाटावर गेलो. सहा वाजताच तिथे आम्ही पोचलो.
आमच्या आधीही तिथे बरीच जणं आली होती तरी आम्हाला वाटलेलं तशी खूप गर्दी नव्हती.
कालची संध्याकाळ अजूनही नसानसात भरलेली होती. काल संध्याकाळी पाहिलेले पक्षीच आताही थव्याथव्याने पाण्यात डुंबत होते, इथून तिथे उडत होते. काही जण त्यांना खायला देत होते आणि पक्षीही नेहमीची सवय असल्यासारखे अगदी न घाबरता त्यांच्या हातातून चोचीने खात होते.
बाजूलाच कोणी पुजा करत होतं तर कोणाचे मंत्रपाठ चालू होते. पहाटेचा गारवा असला तरी बोचरा नव्हता तर तनामनाला प्रफुल्लित करणारा होता. पाणीसुद्धा वाटले तितके गार नव्हते . आमच्यातील काहीजणांनी गंगेत डुबकी मारली .
आम्हाला मात्र डुबकी मारण काही जमलं नाही. ओलेत्याने थंड वार्यात सर्दी झाली असती तर पुढच्या सर्वच सहलीवरून पाणी फिरलं असतं म्हणून मी सतीश आणि इतर काही जणांनी फक्त गंगेच्या पवित्र पाण्यात पाय बुडवले आणि प्रोक्षण केलं.
नंतर तिथेच बाजूला गरमागरम कुल्हड चहा घेतला.
घाटावरच एकिकडे काहीजण आपली कला सादर करत होते. एका ८/१० वर्षांच्या मुलीने अतिशय सुरेल आवाजात गाणे म्हटले, इतर काही जणांनी विनोदी खुमासदार किस्से सांगितले .
तिथे 'काशी साहित्य कला उत्सव' सुरू असल्याचा बोर्ड लावला होता. कोणालाही आपली कला सादर करायची परवानगी होती.
मग आमच्यातील सुप्रियाताई आणि अविनाश भाऊजींनी सुद्धा सुरेख भक्तिगीते म्हटली.
तिथून मग आम्ही हाॅटेलवर परतलो आणि नाश्ता करून बसने पुढील सहल सुरू केली.
सर्वात आधी बनारस हिंदु युनिव्हर्सिटी पाहायला गेलो.
ह्या विश्वविद्यापीठाची स्थापना १९१६ साली महामाना पंडित मदन मोहन मालवीय ह्यांच्या हस्ते झालेली. ह्या विश्वविद्यालयाचे आवार इतकं प्रचंड आहे कि आम्ही बसमधूनच सगळे विभाग पाहिले.
प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मोठमोठ्या इमारती आहेत. त्यांचे ग्रंथालय अतिशय जुने असून तिथे जवळजवळ दहा लाखाच्या वर ग्रंथ आहेत. त्यापैकी अनेक ग्रंथ दुर्मिळ आहेत.
हे विद्यापीठ भारतातील तिसरे सर्वात मोठे विद्यापीठ आहे.
तिथून मग आम्ही दुर्गाकुंड मंदिरात गेलो. १८ व्या शतकातील हे मंदिर लाल दगडांनी बांधलेलं आहे. देवी इथे स्वतः प्रकट झाल्याने इथे तिची मूर्ती नसून यंत्ररूपातील तिच्या प्रतिकाची इथे पूजा होते.
मंदिराच्या परिसरात काळभैरव, कालीमाता वगैरेंची सुद्धा लहान मंदिर आहेत. मंदीराच्या आवारात अनेक ठिकाणी होमहवन सुरू होते.
काहीजण हात पाहून ज्योतीष सांगत होते. तर काही ठिकाणी तांत्रिकांची साधना सुद्धा चालू होती. तंत्र साधनेसाठी शाक्तपंथींमध्ये हे मंदिर फार महत्त्वाचे असल्याचे कळले.
तिथून मग संकटमोचन हनुमान मंदिर पाहिले. तुलसीदासांनी रामचरित मानस लिहील्यानंतर मारूतीरायाने त्यांना इथे ह्याच ठिकाणी दर्शन दिले होते.
इथेसुद्धा हनुमान प्रकट झाले म्हणून त्यांची मानवनिर्मित मूर्ती नाही तर स्वयंभू आकृती आहे. ही आकृती पूर्णपणे मातीची बनलेली आहे.
तुलसीदासांनी बांधलेल्या ह्या मूळ मंदीराचा जीर्णोद्धार १९०० साली मदन मोहन मालवीय ह्यांनी केला.
इथे मारूतीरायाला शुद्ध तुपातील बेसन लाडवांचा भोग चढवला जातो.
तिथून आम्ही तुलसी मानस मंदिर पाहायला गेलो. हे संगमरवरी मंदिर तुलसीदासांनी ज्या ठिकाणी रामचरितमानस लिहीले तिथेच बांधले आहे.
इथे तळमजल्यावर राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्त्या आहेत .
एका बाजूला माता अन्नपूर्णा आणि शंकराचे मंदीर आहे तर दुसर्या बाजूला सत्यनारायणाचे मंदिर आहे.
पहिल्या मजल्यावर तुलसीदासांची ध्यानमग्न मूर्ती आहे. मंदिराच्या चारीबाजूंनी भिंतींवर संपूर्ण रामचरितमानस लिहिलेले आहे .
रामायणातील काही महत्त्वाचे प्रसंग रेखाटलेले आहेत.
वरच्या मजल्यावर एका खोलीत दहा रूपये तिकीट घेऊन श्रीरामलीला आणि श्रीकृष्णलीलेचे चलचित्र दाखविण्यात येत होते .
आमच्या पैकी वर गेलेल्या माधुरी ताईंनी ही बातमी सांगितली. पण हा कार्यक्रम अर्ध्या तासाचा होता आणि आमचा पुढचा कार्यक्रमही भरगच्च असल्याने तितका वेळ आमच्याकडे नव्हता. त्यामुळे कोणीही वरती गेलो नाही .
इथून मग आम्ही सारनाथला जायला निघालो. सारनाथला पोचेतो दुपार झाली आणि सर्वांना भुका लागल्या होत्या. पण जवळपास एकही ढाबा किंवा साधेसे हाॅटेलही नव्हते .
मग काहीजणांनी तिथल्या फळवाल्यां कडून फळं विकत घेऊन खाल्ली.
मी शहाळ्याचं पाणी प्यायले आणि चमचमीत काही नको म्हणून फक्त बनमस्का खाल्ला. काहिंनी तिथेच रस्त्याच्या कडेवर असलेल्या ठेल्यावर चाट खाल्ला, बॅगेत असलेले चिवडा लाडू बाहेर आले आणि अशा प्रकारे सर्वांनी पोटं भरून घेतली.
आणि मग आम्ही स्तूप पाहायला निघालो. बाहेरच अनेक छोटेमोठे स्टाॅल्स होते .
त्यात बनारसी सिल्कच्या वेगवेगळ्या आकाराच्या बॅग्स, पर्सेस, बुद्धाच्या मूर्त्या आणि असे बरेच काही होते.
तिथे सर्वांनीच काहीना काही खरेदी केली.
सारनाथ हे बौद्धधर्मियांसाठी अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे . कारण आत्मसाक्षात्कार झाल्या नंतर गौतमबुद्धांनी
सर्वप्रथम उपदेश इथेच केला होता.
सम्राट अशोकाने बौद्धधर्म स्वीकारल्या नंतर अनेक स्तूप निर्माण केले त्यातलाच हा एक महत्त्वाचा स्तूप.
हा स्तूप अष्टकोनी असून याचे बांधकाम विटांनी केलेले आहे. स्तूपाच्याच अगदी बाजूला एक शिवमंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला जैनांचे ११ वे तिर्थंकर श्रेयांस यांचे एक जैनमंदिर सुद्धा आहे.
तिथलाच एक गाईड आम्हाला त्या स्तूपाची, तिथल्या परिसरातील उत्खननात सापडलेल्या सर्व अवशेषांची आणि मूर्त्यांची इत्थंभूत माहिती देत होता. गौतम बुद्धांचा संपूर्ण जिवनकाळच त्याने आमच्यासमोर कथनस्वरूपात साकारला.
तिथेच केवळ आपल्या भारताचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाची शान असणारा अशोकस्तंभ ठेवलेला आहे. मूळ स्तंभ ५५ फुट ऊंच होता. पण आज तिथे फक्त साडेसात फुटाचा स्तंभाचा तुटलेला तुकडा ठेवलेला आहे.
ह्या स्तंभावर तीन वेगवेगळ्या ऐतीहासिक काळातील तीन लेख कोरलेले आहेत.
सम्राट अशोकच्या काळातील पहिला लेख ब्राह्मी लीपीत आहे. दुसरा लेख कुषाण काळातला आणि तिसरा गुप्त काळातला लेख आहे.
उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे तिथेच एक संग्रहालयही आहे.
वरील स्तंभाचा वरचा भाग ह्या संग्रहालयात ठेवलेला आहे. सॅंडस्टोनच्या बनलेल्या ह्या स्तंभावर आज इतक्या शतका नंतरही अतिशय सुरेख चकाकी आहे. पण ही चकाकी कशामुळे आहे, त्यासाठी कोणते द्रव्य किंवा तंत्र वापरले आहे ते आजपर्यंत कळलेले नाही.
कारण त्या काळाच्या आधी किंवा नंतर कधीच अशाप्रकारचे तंत्र वापरलेली कोणतीही वस्तू आजवर सापडलेली नाही. अनेकांनी ह्यावर संशोधन केले आणि आजही कित्येक जण संशोधन करतच आहेत.
आमचा गाईडने प्रचंड अभिमानाने आणि कौतुकाने सगळं काही छान समजावून सांगितलं. स्तूप , संग्रहालय, आजूबाजूचा बगीचा, स्वच्छ निवांत परिसर सारं काही पाहून झालं पण तोवर माझ्या पोटातलं शहाळ्याचं पाणी घिरट्या घालायला लागलं होतं आणि डोकं दुखायला सुरूवात झाली होती.
आम्ही सगळे बसमध्ये बसलो. हाॅटेलवर परतताना प्रज्ञाने एका बनारसी साड्यांच्या फॅक्टरी आउटलेट समोर बसेस थांबवल्या.
इथून ज्यांना खरेदी करायची होती त्या दुकानात थांबल्या आणि दुसर्या बसने बाकीचे हाॅटेलवर परतले.
मला तरी काहीही घ्यायचं नव्हतं आणि बरंही वाटत नव्हतं त्यामुळे मी रूमवर येऊन सरळ सात वाजताच झोपी गेले.
कारण त्या रात्री आम्हाला साडेबाराला उठायचं होतं. हो बरोबर ऐकलंत. रात्री साडेबारालाच .
(क्रमशः)
© नयना पिकळें
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा