पाचवा दिवस
दुसर्या दिवशी आमचा अयोध्येचा प्रवास सुरू झाला. आज सर्वांमध्ये एक वेगळीच उर्जा जाणवत होती.
आधी
राहूलने सर्व देवतांच्या नावांचा रोजच्या प्रमाणे गजर केला. मग सर्वांनी रामरक्षा म्हटली, भीमरूपी, हनुमानचालिसा वगैरे झालं.
आमच्यातील सुप्रियाताई, रोहिणीताई कुलकर्णी, माधुरीताई जोशी , अविनाश भाऊजी आणि मिस्टर जोशी सर्वांनीच अतिशय सुरेल आवाजात रामरायांची भजनं गायली. आमची संपूर्ण बस अगदी राममय झाली होती.
दुपारी अयोध्येला पोचलो आणि हायवे जवळच्या जानकी रसोई मध्ये जेवलो.
सध्या अयोध्येला रामललाच्या दर्शनाला जाणार्या भक्तांसाठी देशभरातून मोफत ट्रेन्स आणि बसेस सुटत आहेत.
अयोध्येत त्यांच्यासाठी राहाण्याची आणि खाण्याची सोय सुद्धा मोफत केलेली आहे.
त्यामुळे अयोध्येला प्रचंड गर्दी होती.
गर्दीमुळे एका विशिष्ट क्षेत्रापुढे बसेसना परवानगी नव्हती.
बसमधून उतरून आम्हाला कमीत कमी 3-4 किलोमिटर चालावं लागणार होतं .
त्यामुळे हायवे जवळच बस सोडली आणि आम्ही निघालो.
राहूलने म्हटलं कि श्रीरामाच्या दर्शना आधी मारूतीरायाचं दर्शन घ्यायचं असतं म्हणून आम्ही आधी हनुमानगढीत हनुमानाचे दर्शन घ्यायचे ठरवले.
हायवेवरून आधी टोटो (तिथे रिक्षाला टोटो म्हणतात) करून काही अंतर पार केलं. तिथून पुढे रिक्षालाही मज्जाव होता.
मग तिथून दीड दोन किलोमिटर चालत गेलो.
रस्त्यावर बघावं तिथे माणसांचे लोंढेच्या लोंढे .
सर्वंच जण एका वेगळ्याच उत्साहाने तोंडाने अखंड रामनामाचा गजर करत पुढे जात होते.
त्या सर्वांमधून कशीबशी वाट काढत आम्ही हनुमानगढी जवळ पोचलो. तिथे रस्त्याच्या मध्यावर डिव्हायडर जवळच सर्वांच्या चपलांचे खच पडले होते.
आम्ही सर्वांनी सुद्धा समोर कोणतं दुकान आहे ती खूणगाठ मनात बांधून एकीकडे चपला बूट ठेवले आणि हनुमान गढीच्या पायर्या चढायला सुरूवात केली.
राहूलने सांगितलं कि श्रीरामांनी शरयु नदीत आपला अवतार संपवते वेळी चिरंजीवी असलेल्या हनुमानावर अयोध्येला सांभाळायची जबाबदारी सोपवली होती. अयोध्येचा पालनकर्ता असल्याने सर्वांवर नजर ठेवता यावी म्हणून त्याचे इथले स्थान असे उंचावर आहे.
इथे दर्शनासाठी मरणाची गर्दी होती. तरीही कुठेही धक्काबुक्की चेंगराचेंगरी नव्हती.
मुख्य मंदीराकडे तर लोकांची ही गर्दी असल्याने आधी आतील मारुतीरायाचे नीट दर्शनच होईना.
तरी आम्ही तिथेच न हलता नेटाने दोन तीन मिनीटं उभे राहिलो आणि मग मात्र अतिशय सुरेख दर्शन झालं.
मग बाहेर येऊन आधी चपला शोधल्या . सर्वांच्या चपला अस्ताव्यस्त झालेल्या तरी सापडल्या.
राहूलच्या बिचार्याच्या चपला मात्र काही केल्या मिळेनात . कितीतरी वेळ तो शोधत बसलेला. पण नाहीच मिळाल्या.
त्याला म्हटलं नवीन घे तर म्हणाला शनिवारी चपला खरेदी करत नाहीत.
मग तो आमच्यासोबत तसाच अनवाणी चालला सगळीकडे.
तिथून मग आम्ही आमच्या मुख्य लक्ष्याकडे निघालो. २०/२५ मिनिटं चालत राममंदिराच्या बाहेर पोचलो. तिथे तर भक्तांचा पूर लोटलेला.
पोलीस बंदोबस्त मात्र ठिकठिकाणी होता आणि ते सर्वांना मदतही करत होते.
योग्य मार्गदर्शन देत होते. आमच्यातील २/३ जणांना पायाचा त्रास असल्याने त्यांनी व्हिलचेअर केली आणि त्यांना दुसर्या मार्गाने मंदिरात नेण्यात आलं.
व्हिलचेअर वरून न्यायला आणायला त्यांचेच कर्मचारी होते.
मग आम्ही बाकीचे सगळे चपला ठेवायला आधी चप्पल स्टॅन्डवर आणि मग मोबाईल आणि इतर सामान ठेवायला लाॅकर साठी लाईनीत उभे राहिलो.
दोन्ही कडे इतकी प्रचंड रांग होती कि सगळं करून प्रत्यक्ष दर्शनाला जायला आम्हाला जवळजवळ तासभर लागला.
त्यानंतर आम्ही मुख्य मंदिराकडे निघालो. भल्यामोठ्या आवारात लाखो लोकांची गर्दी होती.
पण कुठेही आरडाओरडा नाही, धक्काबुक्की भांडणं काहीही नाही.
सगळेजण एकमेकांना समजून घेत प्रेमाने अगदी शिस्तीत पुढे जात होते.
पोलीस बंदोबस्ता सोबतच तिथे इतरही अनेक कर्मचारी देखरेख करण्यासाठी होते.
प्रत्येकजण हसतमुख आणि आपल्या कामात तत्पर.
अगदी स्वतःहून येऊन काही हवं नको विचारत होते, हवी ती मदत करत होते.
ह्याबाबतीत त्या सर्वांचं खरच कौतुक वाटलं. न कंटाळता हसर्या चेहर्याने दररोज लाखो भक्तांची सोय पाहाणं म्हणजे खायचं काम नाही.
चालत चालतच आम्ही पायर्यांजवळ पोचलो. पायर्या चढल्या आणि भोवतालच्या सभामंडपाची भव्यता नजरेत भरली.
सोन्याने मढवलेले ते दिमाखदार भव्य सभामंडप आणि अगदी लांबूनच दिसणारी रामललाची ती गोजिरवाणी श्यामल मूर्ती .
अगदी लांबूनच मूर्ती दिसत असल्याने जवळ जाईपर्यंत अगदी डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत दर्शन घेता आलं.
आजपर्यंतच्या आयुष्यात सगळीकडे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशाच श्रीरामांच्या दर्शनाची सवय झाली होती.
पण श्रीरामांचं हे बाळरूप अतिशय लोभसवाणं. कितीही पाहिलं तरी मनाची तृप्ती होतच नव्हती.
मूर्तीजवळ गेल्यावर आम्ही आमच्याकडे असलेल्या अक्षता रामललावर घातल्या. तिथे गर्दी असल्याने कोणालाच थांबायला देत नव्हते तरी जरा पुढे गेल्यावर तिथल्या एका सिक्यूरिटीने आमच्या रेंगाळण्याकडे मुद्दामच काणाडोळा केला आणि आणखी दोन मिनीटं दर्शनाचं सूख आम्ही उपभोगलं.
आम्ही सगळेच मंत्रमुग्ध अवस्थेत होतो.
मंदिरा बाहेर आलो तर आवारातही एकीकडे छोटीशी राममूर्ती पालखीत ठेवून तिथे रामाचं भजन चालू होतं . सगळं वातावरणच अतिशय भारावलेलं असं होतं.
बाहेर आलो आणि परत मोबाईल आणि चपलांसाठी तितकाच वेळ रांगेत उभे राहिलो.
मग तिथे प्रसाद मिळत होता तो घेतला, कोणाला दान करायचे होते त्यांनी रितसर पावती फाडली.
काहींनी मंदीरातल्या हुंडीतच पैसे दान केले होते.
व्हिलचेअरवाले दहा मिनिटात स्पेशल दर्शन झाल्याने तासभर आमची वाट बघत बाहेर बसलेले.
मंदिराच्या बाहेर पडेतो संध्याकाळ होऊन गेली होती. अंधार पडू लागला होता.
राहूल आम्हाला विचारत होता कि दशरथ महल आणि कनक महल पाहायचा आहे का म्हणून .
खरंतर चालून चालून सगळेच थकले होते आणि मुख्य रामदर्शन मनासारखं झाल्याने फारशी कोणी उत्सुकताही दाखवली नाही.
पण आमच्यातील काहींना लता मंगेशकर चौक मात्र पाहायचा होता. म्हणून मग सरळ तिथेच जायचं ठरलं.
तिथे जाण्यासाठी परत एक दीड किलोमिटर सरळ चालत जावं लागणार होतं.
सर्वांना उत्साह दांडगा पण पायात तर बळ नाही. म्हणून मग त्या मुख्य रस्त्यावर वाहनांना परवानगी नसल्याने आम्ही टोटो करून जरा लांबच्या रस्त्यावरून तीन चार किलोमिटरचा फेरा मारून चौकाजवळ आलो.
वाटेत बाहेरूनच कनक महालाचे ओझरते दर्शन आम्हाला घडले.
लता मंगेशकर चौकात एक भलीमोठी चांदीची वीणा ठेवलेली आहे. अतिशय कल्पकतेने वीणेचे प्रतीक वापरून गानसम्राज्ञीला दिलेली ही मांनवंदना खूप आवडली.
आपल्या हक्काचं काहीतरी पाहात आहोत असं वाटलं कारण लतावर आपल्या सर्वांचाच हक्क आहे.
आजूबाजूला शोभेची फुलझाडं लावून ती जागा सुशोभित केली आहे. तिथल्या मार्गावरही देखण्या दिव्यांचा लखलखाट केलेला आहे.
पण तरीही त्या वीणेसोबत लता मंगेशकरची सुद्धा एक लहानशी का होईना मूर्ती हवी होती असे मला तरी सारखे वाटत राहिले.
आता मात्र रात्र झाल्याने हाॅटेलवर परतायचे होते. पण त्याआधी लांब कुठेतरी पार्किंगमध्ये असलेली आमची बस आम्हाला गाठायची होती.
आता इथे एक वेगळाच किस्सा झाला.
त्या बस ड्राईव्हरला फोन केला तर तो नक्की कुठे उभा आहे हे त्यालाच सांगता येईना. कुठल्या तरी एच पी पेट्रोल पंपचं फक्त तो नाव घेत होता.
मग काय परत टोटो करून निघालो सगळे. टोटो काही अंतर गेली आणि थांबली. तिथून दुसरी टोटो केली . तीसुद्धा काही अंतरापलिकडे जाईना.
कारण काही सिक्युरिटी कारणामुळे सर्व टोटोंना ठराविक क्षेत्र नेमून दिलेली आहेत असे कळले.
मग काय तिथेच उभं राहून आता काय करावं ह्या विचारात आम्ही सर्वच होतो.
आम्हाला असे भर रस्त्यावर उभे पाहून तिथल्या पोलीसांनी आमच्यासाठी एक बस थांबवली.
सरकारने अयोध्येत येणार्या रामभक्तांसाठी गावातल्या गावात फिरण्यासाठी ही पूर्णपणे मोफत सुविधा ठेवलेली आहे.
आम्ही बसमध्ये बसलो तरी आमच्या बस ड्राईव्हरचा पत्ता काही कळेना.
शेवटी ह्या सरकारी बसमधूनही मध्येच एके ठिकाणी उतरलो. परत तिथून दुसर्या एका पोलीसाच्या मदतीने दुसरी बस मिळाली.
त्या बसने शेवटी आम्हाला योग्य त्या पेट्रोल पंप जवळ पोचवलं .
पण पेट्रोल पंप जवळ कुठेही आमची बस दिसेचना.
फोन केला तर पेट्रोल पंपच्या पार पलिकडे दुसर्या बाजूला आमची बस उभी होती .
आम्हाला पाहून बसमधला मुलगा धावत धावत आम्हाला बोलवायला आला म्हणून कळलं तरी.
कारण तोवर प्रज्ञा आमची बस दिसत नव्हती म्हणून दुसर्याच बाजूला बसला शोधायला गेलेली.
मग परत कदम दो कदम करत आम्ही पाय कसेबसे रेटत बसपर्यंत गेलो आणि एकदाचे बसमध्ये धप्पकन बसलो.
वाटेत प्रज्ञाला पिक अप केल आणि पोचलो एकदाचे हाॅटेलवर.
कोणाच्याही अंगात त्राण उरलं नव्हतं. पण कसेबसे चार घास जेवलो आणि झोपी गेलो.
आजही मोबाईल कुठेच अलाऊड नसल्याने फार कमी फोटो आहेत.